स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या
क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री
माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये
जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या
कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे
तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात
येतील; असे आश्वासन दिले होते.
त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात
आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद
भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती
या पदावर झाली.
मंडळाचे मुख्य उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य
उद्दिष्ट ‘पुस्तक प्रकाशन’ हे आहे. या मुख्य उद्दिष्टानुसारच सदर योजनेअंतर्गत
साहित्य, संस्कृती, कला, इतिहास यासारख्या
विषयांवर वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाड्मयीन संशोधन या प्रकारचे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण मौलिक स्वरूपाचे ग्रंथ मंडळाकडून
प्रकाशित केले जातात. खाजगी प्रकाशकांकडून जे गंभीर, वैचारिक, उच्च दर्जाचे बौद्धिक, वाङ्मयीन संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केले जात नाही
असे अत्यंत महत्त्वाचे गंभीर वाङ्मयीन संशोधनात्मक ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले
जातात.
"आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन
सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि
संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील
अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान
देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष
केंद्रित केले आहे.
"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने" प्रकाशित केलेली ४३४ पुस्तके वाचकांसाठी PDF, Mobi, EPub या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..
No comments:
Post a Comment